सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटणमध्ये दोन युवकांच्या वर खुनी हल्ला.. फलटण शहर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..?
नेमकी घटना काय?
आज रविवार, सुट्टीचा आणि बाजाराचा दिवस असल्याने रात्रीच्या वेळीही शंकर मार्केट परिसरात मोठी वर्दळ होती. रात्री ९ वाजेच्या सुमारास अनिल आणि संतोष हिरणवळे यांनी संबंधित आरोपींना 'गर्दीत गाडी जोरात चालवू नका' असे हटकले. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, याच किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. आरोपींनी सुरुवातीला वाद घातला आणि ते तिथून निघून गेले.
मात्र, काही वेळातच हे आरोपी १०-१२ जणांच्या टोळक्यासह हातात धारदार शस्त्रे, दगड आणि काचेच्या बाटल्या घेऊन पुन्हा घटनास्थळी परतले. काहीही विचार न करता त्यांनी अनिल आणि संतोष यांच्यावर तुटून पडत त्यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना पाहून परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली.
लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये गर्दी; पोलिसांचा फौजफाटा तैनात
हल्ल्यानंतर जखमींना तातडीने फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटल परिसरात तरुण आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्ये धाव घेतली असून चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल: पोलिसांची दहशत संपली का?
शहराच्या हृदयस्थळी, जिथे नेहमी लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी टोळक्याने येऊन शस्त्राने वार करणे, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. या घटनेनंतर फलटणकरांमधून संताप व्यक्त होत असून "पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का?" असा टोकदार सवाल आता विचारला जात आहे.
पुढील तपास:
प्रथमदर्शनी हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की केवळ तत्कालीन वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. फलटण पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Post a Comment
0 Comments